आजकाल क्रेडिट कार्ड प्रत्येकाच्या खिशात आहे. ऑनलाइन शॉपिंग, रेस्टॉरंट बिल, प्रवास, मेडिकल खर्च – सगळ्यासाठी क्रेडिट कार्ड वापरलं जातं. पण जर वेळेवर क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर काय होतं, याची खरी माहिती फार कमी लोकांना असते.

अनेकांना वाटतं नंतर भरू पण तेच नंतर मोठी अडचण बनतं. कारण बिल न भरल्यावर बँका पैसे वसूल करण्यासाठी ठराविक पद्धतीने कारवाई करतात आणि त्याचा थेट फटका तुमच्या खिशाला आणि CIBIL स्कोअरला बसतो.
सुरुवातीला बँक तुम्हाला कॉल, SMS आणि ईमेलद्वारे सतत रिमाइंडर पाठवते. आज शेवटची तारीख आहे. बिल थकबाकी आहे असे मेसेज येऊ लागतात. इथे बँक तुम्हाला सौम्य भाषेत पैसे भरण्याची विनंती करते. पण तरीही तुम्ही बिल भरलं नाही तर पुढचा टप्पा सुरू होतो.
यानंतर बँक उशीरा पेमेंट शुल्क आणि भरमसाठ व्याज जोडते. क्रेडिट कार्डवर व्याज दर खूप जास्त असतो आणि तो रोजच्या रोज वाढतो. 5-10 हजारांचं बिल काही दिवसांत 12-15 हजारांपर्यंत जाऊ शकतं. म्हणजेच तुमचं छोटं बिल हळूहळू मोठ्या कर्जात बदलतं.
हे वाचा: क्रेडिट कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास बिल कोण भरणार? बँका नातेवाईकांकडून पैसे वसूल करू शकतात का?
तरीही पैसे भरले नाहीत तर बँक तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक करते. नवीन व्यवहार करता येत नाहीत आणि अनेक वेळा क्रेडिट लिमिटही कमी केली जाते. याच टप्प्यावर तुमचा CIBIL स्कोअर घसरायला सुरुवात होते, ज्याचा परिणाम पुढे कर्ज, होम लोन किंवा कार लोन घेताना होतो.
यानंतर बँक प्रकरण रिकव्हरी टीम किंवा थर्ड पार्टी वसुली एजंटकडे देते. हे एजंट तुम्हाला फोन करतात, कधी कधी घरी येतात आणि पैसे भरण्याची मागणी करतात. मात्र त्यांना RBI च्या नियमांनुसारच वागावं लागतं, जबरदस्ती करता येत नाही.
तरीही पैसे मिळाले नाहीत तर शेवटचा पर्याय म्हणजे कायदेशीर कारवाई. बँक तुमच्यावर कायदेशीर नोटीस पाठवते, दिवाणी न्यायालयात केस दाखल करू शकते आणि सेटलमेंटचा पर्याय देते. अशा वेळी फक्त पैसेच नाही तर तुमची प्रतिमा आणि भविष्यातील आर्थिक विश्वासार्हताही धोक्यात येते.
म्हणूनच क्रेडिट कार्ड वापरणं चांगलं आहे, पण वेळेवर बिल भरणं त्याहून महत्त्वाचं आहे. नाहीतर सोयीचं साधन कधी मोठं आर्थिक ओझं बनेल, हे कळणारही नाही.

