Amit Thackeray writes to Prime Minister Narendra Modi: या नाजूक काळात विजयाचे उत्सव साजरे करणे टाळावे असे त्यांचे मत आहे. त्याऐवजी, ठाकरे यांनी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन मदत देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अशा बलिदानानंतर समाजाने अधिक दयाळू आणि संवेदनशील असले पाहिजे असे त्यांना वाटते.

अलिकडच्या काळात सुरू असलेल्या संघर्षामुळे अनेक नागरिकांमध्ये देशभक्ती अधिक बळकट झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करणारे आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी युद्धबंदी लागू असताना विजय साजरा करणे टाळण्याचे आवाहन लोकांना केले आहे. त्यांनी हे आवाहन थेट पंतप्रधानांना लेखी पत्राद्वारे केले आहे.
अमित ठाकरे यांचे पत्र काय?
नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या नेतृत्त्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली. राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण आहेत, याबद्दल आभार. मात्र सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहेत. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने देशाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केल आहे.
आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावर सैनिकांच्या कार्याला सलाम केला जातोय. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेम आणि गर्वाने पाहतोय. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे हे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.
या पार्श्वभूमीवर, काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून युद्धविराम आहे. म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्या काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदनादायी आहेत.
या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य हे असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय) समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे. बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
सध्याचा घटनाक्रम पाहता, देशात काही गंभीर बाबीविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यात 26 निरपराध पर्यटकांनी आपले प्राण गमावले, तो अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे, ही जनभावना आहे.
याशिवाय, भारत-पाक सीमारेषेवर गेल्या काही दिवसात आपले काही नागरिक आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल.
युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहास पाहता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशाच संधींमध्ये दगाफटका केला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणं, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावं, हे मार्गदर्शन करणं आणि त्यांची मानसिक तयारी घडवण, हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग असावं
मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासून विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा. तसेच देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.
आपला नम्र,
अमित ठाकरे